Total Pageviews

Tuesday 27 May 2014

कर्म मुक्ती



जीवाला जन्म मिळाला की त्याबरोबरच कर्म ही आलेच असे संत म्हणतात .किंबहुना जन्म हे पूर्व कार्मांचेच फलित आहे असे वेदांत सांगतो . पूर्व जन्मांच्या कर्मांचे फलित भोग ,  भोगण्यासाठीच आपल्या सारखी सामान्य माणसे जन्म मरणाच्या फेर्यात अडकून पडतात . तेव्हा कर्म हे काही  टाळता येत नाही आणि कर्म केले की त्याचे फळ हे मागून येतेच ( Cause will have an effect  or every effect has a cause    )  मग जन्म मरणाचा हा फेरा चुकवावा तरी कसा ? हा तिढा सुटणार तरी कसा ? मोक्ष मिळणार तरी कसा  ?



पहिले आपल्याला हे उमजणे आवश्यक आहे कि कर्म घडतात तरी कशी ? कर्माचे मूळ अधिष्ठान कुठे आहे ? विचार केला कि लक्षात येते कि कर्माचे मूळ ' इच्छा ' हे आहे . इच्छाच   कर्मेंद्रियांना कर्म करण्यास भाग पाडते. मग  इच्छा ’ कुठून उत्पन्न होते ? तर ती मनातून उत्पन्न होते . म्हणजेच सर्व कर्मांचे मूळ हे आपले मन आहे . मनात इच्छा का उत्पन्न होतात ? मन हे अहं भावनेने भरलेले असते. ते सतत आपले अस्तित्व दाखवण्या साठी झघडत , धडपडत असते . आपले अस्तित्व टिकवण्यासाठी ते सतत इच्छा निर्माण करत असते कर्म घडवून आणत असते . मन हे इच्छे वरच  जगते . कर्मांच्या फालावारच ते जगते पोसले जाते . कर्म संपली की मनाचे अस्तित्वच संपले . वेदांत संतांची उक्तीच आहे की ' मन ' मेले की ' अहं किंवा ' मी ' मारतो , ' मी ' मेला की कर्म कसे घडणार ? घडणारच नाही ! , आणि कर्माच जर संपले तर फळ कोठून येणार ? फळच नाही  तर ते भोगायला जन्म कुठचा ?



आपण वर पहिले की कर्म कसे घडते . पण कर्म म्हणजे नेमके काय ? त्याची संज्ञा काय ?  हे पडताळण्याचा प्रयत्न करू ? समजा की तुम्ही या जगात एकटेच आहात दुसरे कुणीच नाही ! मग तुम्ही खाता , पिता , झोपता ,चालता , फिरता , विश्रांती घेता तेव्हा कर्म घडते का ? नाही घडत ! हे कर्म जरी असले तरी ते वेदांतात अपेक्षित असलेल्या कर्मांच्या संज्ञेत बसत नाहीत . तेव्हा ही कर्मे नव्हेत . आता समजा तुम्ही चालला आहात . चालता  चालता तुम्हाला एक मुंगी दिसली तुम्ही तिला ठेचलीत तर हे मात्र कर्म झाले .  किंव्हा तुम्ही समुद्र किनार्यावर फिरत असताना एक व्यक्ती बुडताना पाहून तुम्ही त्या व्यक्तीला बुडण्यापासून वाचविलेत तर हे सुद्धा कर्म या संज्ञेस पात्र ठरते . तेव्हा विचार केल्या वर लक्षात येईल की कर्म घडण्या साठी त्या कर्माचे संस्कार एकापेक्षा अधिक जीवांवर घडले पाहिजेत . तेव्हाच कर्म घडते . हे असे आपले मला वाटते , तुम्हाला ते पटेलच किंव्हा पटलेच पाहिजे असे नाही . पटले तर घ्या नाहीतर सोडून द्या .

 

आता आपण पहिले की , मनातल्या ' मी ' ला मारले की मन मरते . मन मेले की कर्म घडत नाही . मग मनाला मारावे म्हणजे काय ? ते कसे करावे ?

कठ उपनिषदांत सांगितल्या प्रमाणे कर्म ही  दोन प्रकारची असतात . एक असते ' श्रेयस कर्म ' दुसरे असते  ' प्रेयस कर्म ' . जीवाने  कोणत्या कर्माचा आचार करावा हे सर्वस्वी त्याच्या हातीच असते .मनाचा कल हा नेहमी प्रेयासाकडे असतो . तो प्रथम श्रेयासाकडे वळवायला हवा कारण प्रेयासामधून फक्त विषय सुखाची प्राप्ती होते ' मी ' ची लालसा वाढते . मग मन श्रेयस कर्मा कडे कसे वाळवावे ? तर ते विवेकाने वाळवावे . विवेक बुद्धीत असतो पण  बुद्धिलाच जर मानतील विषयांनी ग्रासले असेल तर विवेक कसा टिकेल ? विवेक हे एकमेव शस्त्र आहे जे मनावर विजय मिळवून त्या ' मी ' ला मारण्यास समर्थ आहे .  ते नसेल तर काही उपयोग नाही . मग हे शस्त्र मिळवावे कुठून ? संत संगतीने व सद्गुरुंनी दिलेल्या नामांत राहूनच ते मिळवता येते . ते एकदा मिळाले की श्रेयसचा प्रेयासावर विजय मिळवता येतो . तो विजय मिळवला की ' मी ' मेलाच म्हणून समजा . ' मी ' मेला की मनाचे अस्तित्व संपलेच की हो ! मन संपले की  द्वैत संपते , द्वैत संपले की कर्मा नष्ट होतात . एकट्याने का कर्म होतात ? जिथे अद्वैत आहे , तिथे कोठला ' मी ' नी  कसले कर्म ? , कसला जन्म आणि कसला मृत्यू  ? कोठेच काहीच  नाही !



संत सोहिरोबानाथ म्हणतात तसे .....

आलो नाही , गेलो नाही I मध्ये दिसणे हे भ्रांती I

जागृत होता स्वप्नची हरपे I कर्पूरन्याये जग  हरले I