Total Pageviews

Tuesday, 9 June 2026

साद वेणूची ( कृष्ण गोपी संवाद)


यमुना तिरी, वृंदावनी सांजवेळी,
का घालते साद मज वेणू बावळी?
येऊ कशी मी सांग तूच कान्हा?
कधी रे पाजू माझ्या बाळास पान्हा?
ओढ तुझी अन्‌ मायेची ही बेडी,
दोन्हीकडे जीव, झाली मी वेडी.
एका करी तू, एका करी बाळ,
कसा विभागू जीव सांग गोपाळ?
किती निष्ठुर झालास रे श्रीकृष्णा,
का दिलीस रे मज ही सूरतृष्णा?

हसला कान्हा वेणू ओठी धरुनी, 
का ग अडकलीस अशी संभ्रमुनी?
बाळ तुझेच, मीही तुझाच आहे, 
सांग मग प्रेमामध्ये भेद कुठे राहे?
ज्या स्तनी तुझ्या पान्हा झरे,
तेथेच माझे यमुनाजल भरे.
बाळाच्या त्या निरागस डोळ्यांत, 
शोध मला तू प्रेमाच्या लाटांत.
तू न यावे वृंदावनी धावून,
मीच येईन तुझ्या घरी हसून.
जिथे माया नि भक्ती एकरूप, 
तेथेच ग माझे खरे स्वरूप.

ऐकून वाणी मुरलीधराची, 
विरली व्यथा त्या गोपीकेची.
बाळास घेतला जेव्हा उराशी जवळ, 
दिसला गोपाळ तिच्या नेत्री अवखळ.
पान्हा फुटता त्या प्रेमधारेत, 
नाद उठला तिच्याच अंतरीत.
यमुना वाहे हृदयामधुनी, 
वृंदावन फुलले तिच्या मनी.

मंगळवार, ९/६/२०२६ , १०:३० PM
अजय सरदेसाई -मेघ

No comments:

Post a Comment