Total Pageviews

Tuesday 27 May 2014

कर्म मुक्ती



जीवाला जन्म मिळाला की त्याबरोबरच कर्म ही आलेच असे संत म्हणतात .किंबहुना जन्म हे पूर्व कार्मांचेच फलित आहे असे वेदांत सांगतो . पूर्व जन्मांच्या कर्मांचे फलित भोग ,  भोगण्यासाठीच आपल्या सारखी सामान्य माणसे जन्म मरणाच्या फेर्यात अडकून पडतात . तेव्हा कर्म हे काही  टाळता येत नाही आणि कर्म केले की त्याचे फळ हे मागून येतेच ( Cause will have an effect  or every effect has a cause    )  मग जन्म मरणाचा हा फेरा चुकवावा तरी कसा ? हा तिढा सुटणार तरी कसा ? मोक्ष मिळणार तरी कसा  ?



पहिले आपल्याला हे उमजणे आवश्यक आहे कि कर्म घडतात तरी कशी ? कर्माचे मूळ अधिष्ठान कुठे आहे ? विचार केला कि लक्षात येते कि कर्माचे मूळ ' इच्छा ' हे आहे . इच्छाच   कर्मेंद्रियांना कर्म करण्यास भाग पाडते. मग  इच्छा ’ कुठून उत्पन्न होते ? तर ती मनातून उत्पन्न होते . म्हणजेच सर्व कर्मांचे मूळ हे आपले मन आहे . मनात इच्छा का उत्पन्न होतात ? मन हे अहं भावनेने भरलेले असते. ते सतत आपले अस्तित्व दाखवण्या साठी झघडत , धडपडत असते . आपले अस्तित्व टिकवण्यासाठी ते सतत इच्छा निर्माण करत असते कर्म घडवून आणत असते . मन हे इच्छे वरच  जगते . कर्मांच्या फालावारच ते जगते पोसले जाते . कर्म संपली की मनाचे अस्तित्वच संपले . वेदांत संतांची उक्तीच आहे की ' मन ' मेले की ' अहं किंवा ' मी ' मारतो , ' मी ' मेला की कर्म कसे घडणार ? घडणारच नाही ! , आणि कर्माच जर संपले तर फळ कोठून येणार ? फळच नाही  तर ते भोगायला जन्म कुठचा ?



आपण वर पहिले की कर्म कसे घडते . पण कर्म म्हणजे नेमके काय ? त्याची संज्ञा काय ?  हे पडताळण्याचा प्रयत्न करू ? समजा की तुम्ही या जगात एकटेच आहात दुसरे कुणीच नाही ! मग तुम्ही खाता , पिता , झोपता ,चालता , फिरता , विश्रांती घेता तेव्हा कर्म घडते का ? नाही घडत ! हे कर्म जरी असले तरी ते वेदांतात अपेक्षित असलेल्या कर्मांच्या संज्ञेत बसत नाहीत . तेव्हा ही कर्मे नव्हेत . आता समजा तुम्ही चालला आहात . चालता  चालता तुम्हाला एक मुंगी दिसली तुम्ही तिला ठेचलीत तर हे मात्र कर्म झाले .  किंव्हा तुम्ही समुद्र किनार्यावर फिरत असताना एक व्यक्ती बुडताना पाहून तुम्ही त्या व्यक्तीला बुडण्यापासून वाचविलेत तर हे सुद्धा कर्म या संज्ञेस पात्र ठरते . तेव्हा विचार केल्या वर लक्षात येईल की कर्म घडण्या साठी त्या कर्माचे संस्कार एकापेक्षा अधिक जीवांवर घडले पाहिजेत . तेव्हाच कर्म घडते . हे असे आपले मला वाटते , तुम्हाला ते पटेलच किंव्हा पटलेच पाहिजे असे नाही . पटले तर घ्या नाहीतर सोडून द्या .

 

आता आपण पहिले की , मनातल्या ' मी ' ला मारले की मन मरते . मन मेले की कर्म घडत नाही . मग मनाला मारावे म्हणजे काय ? ते कसे करावे ?

कठ उपनिषदांत सांगितल्या प्रमाणे कर्म ही  दोन प्रकारची असतात . एक असते ' श्रेयस कर्म ' दुसरे असते  ' प्रेयस कर्म ' . जीवाने  कोणत्या कर्माचा आचार करावा हे सर्वस्वी त्याच्या हातीच असते .मनाचा कल हा नेहमी प्रेयासाकडे असतो . तो प्रथम श्रेयासाकडे वळवायला हवा कारण प्रेयासामधून फक्त विषय सुखाची प्राप्ती होते ' मी ' ची लालसा वाढते . मग मन श्रेयस कर्मा कडे कसे वाळवावे ? तर ते विवेकाने वाळवावे . विवेक बुद्धीत असतो पण  बुद्धिलाच जर मानतील विषयांनी ग्रासले असेल तर विवेक कसा टिकेल ? विवेक हे एकमेव शस्त्र आहे जे मनावर विजय मिळवून त्या ' मी ' ला मारण्यास समर्थ आहे .  ते नसेल तर काही उपयोग नाही . मग हे शस्त्र मिळवावे कुठून ? संत संगतीने व सद्गुरुंनी दिलेल्या नामांत राहूनच ते मिळवता येते . ते एकदा मिळाले की श्रेयसचा प्रेयासावर विजय मिळवता येतो . तो विजय मिळवला की ' मी ' मेलाच म्हणून समजा . ' मी ' मेला की मनाचे अस्तित्व संपलेच की हो ! मन संपले की  द्वैत संपते , द्वैत संपले की कर्मा नष्ट होतात . एकट्याने का कर्म होतात ? जिथे अद्वैत आहे , तिथे कोठला ' मी ' नी  कसले कर्म ? , कसला जन्म आणि कसला मृत्यू  ? कोठेच काहीच  नाही !



संत सोहिरोबानाथ म्हणतात तसे .....

आलो नाही , गेलो नाही I मध्ये दिसणे हे भ्रांती I

जागृत होता स्वप्नची हरपे I कर्पूरन्याये जग  हरले I

Wednesday 30 April 2014

श्रद्धा आणी तिचे महत्व






अश्रद्धया हुतं दत्तं तपस्तप्तं कृतं यत I
असदित्युच्यते पार्थ तत्प्रेत्य नो इह II  . गि . १७-२८
 


हे पार्थ , अश्रद्धेने केलेले हवन ,दिलेले दान , आचरलेले तप केलेले जे कर्म असेल त्याला सत असे म्हणतात . हे सत या लोकी परलोकीही लाभदायक नाही . म्हणून भगवंताला अर्पण करताना नितांत श्रद्धेची आवश्यकता आहे .

खूप पूर्वी एकदा भारतात मोठा दुष्काळ पडला होता . एक गाव जे पूर्णपणे शेतीवरच निर्भर होते ते ह्या दुष्काळाच्या कचाट्यात खूप  वाईट सापडले.पावसा अभावी नद्या ,नाले , झरे , विहिरी  सुकल्या  , जमीन कोरडी पडली . अन्न नाही , पाणी नाही , प्राण्यांना द्यायला गवत नाही अशी परिस्तिति.  त्यात वरून सूर्याचे खालून जमिनीचे रणरणत्या निखार्यागत चटके. हळू हळू प्राणी लोकं मारू लागले.पाण्याच्या एका थेंबा साठी एका अन्नाच्या घासासाठी चोर्या दरोडे पडू लागले. गावची लोकं बिचारी हवालदिल झालेली .
शेवटी गावच्या जाणत्या लोकांनी गावातील देवळाच्या पुजार्याला विनंती केली दुष्काळ जाण्यासाठी आणि वर्षा वृष्टी होण्यासाठी काहीतरी दैवी उपचार करावे . पुजारी ब्राम्हणाने सांगितले कि उद्या सर्व गावकर्यांनी मंदिराच्या प्रांगणात जमावे . आपण सर्व मिळून परमेश्वराची प्रार्थना करूयात , पाउस नक्की पडेल व दुष्काळ मिटेल .
दुसऱ्या  दिवशी सांगितल्या प्रमाणे सगळे गावकरी देवळाच्या प्रांगणात जमले .एक गरीब गावकरी जो जरा उशिरा पोचला होता त्याचाकडे सर्व अचंब्याने पाहू लागले . जणू काही विचित्र देखावा पाहावा तसे . त्या गावकर्याने सोबत छत्री आणलेली होती .रणरणत्या उन्हात , पाउसचे एक हि चिन्ह किंवा ढग नसताना ह्या वेड्याने छत्री आणली हे पाहून सर्व गावकरी हसून जणू त्याची टर खेचू लागले .दृश्य होते हि मोठे विचित्र .पाउस नाही , पाउसाचा थेंब नाही आणि हा आपला आला छत्री घेऊन ! असो .
प्रार्थनेचा कार्यक्रम यथासांग पार पडला सर्व आपापल्या घरी जाण्यास निघाले.कुतूहलाने कुत्सित पणे काही लोकांनी त्याला छत्री आणल्या बद्दल विचारले .
"आर  वेड्या , पाउसाचा मौसम नाई , पाउसचे चिन्ह कुणीकडे दिसत नाई , आणि तुरे मारे छत्री घेऊन आलास . कश्या पाई ?
तो गावकरी म्हणाला  " लोकांनु , देव देतो नि देवच घेतो . मला खात्री हाय कि देव आपली प्रार्थना ऐकेल आनी मोप पाउस पडल , देवाच्या करणीने दुष्काळ मिटल ."
लोकं त्याच्यावर हसायला लागले, त्याला वेडाऊ लागले  , त्यांना दिसत होते ते रणरणते उन जे आजूनही अंगाला चटके देत होते .त्याची श्रद्धा विश्वास कोणालाही दिसत नव्हता .
आणी अचानक , अघटीत घडले ...
सुसाट वारा वाहू लागला , काळे ढग जमू लागले , वीज कडाडली आणी धोधो पाउस पडू लागला . सर्व गावकरी विस्मयीत झाले , त्यांच्या कुत्सित नजरा पाणावल्या . त्यांचे डोळे उघडले .त्यांनी मान्य केले कि त्या एकट्या गावकर्याच्या भक्ती पूर्ण श्रद्धेने केलेल्या प्रार्थने मुळेच पाउस पडला . बाकी सर्व गावकरी फक्त नावाला जमले होते .

म्हणूनच भगवान श्री कृष्ण म्हणतात कि प्रत्येक कर्मात श्रद्धा असणे आवश्यक आहे .अश्रद्धेने केलेले कोणतेही कर्म फलत नाही . ना या लोकांत ना परलोकांत