Total Pageviews

Saturday 23 December 2023

कर्माय तस्मै नमः


 

कर्माय तस्मै नमः

🙏


श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरित्रांत नरसावधानी पिठापुरांत असताना ते नेहमी श्रीपादांचा द्वेष करत कारण मुळात ते बापनाचार्यांचा द्वेष करत. नरसावथांनींच्या त्या जन्मात ही श्रीपाद प्रभुंनी नरसावधानींवर कृपा करण्यासाठी घेवड्या ( राजगिरा) च्या भाजी ची मागणी केली होती . श्रीपादप्रभूनी पुढे नरसावधानींवर येणारी लक्ष्मी ची अवकृपा आणि इतर संकटं टाळण्या साठी त्याच्या कडून घेवड्या ची मागणी केली होती . पण म्हणतात ना की दैव ( श्रीपाद प्रभू ) देते आणि कर्म नेते तसेच नरसावधानींच्या बाबतीत घडते. ते श्रीपाद प्रभूंना भाजी देण्यास नकार देतात. हा घेवडाच त्यांचे वाईट नशिब असते. परमेश्वर तुमच्या वर कृपा करण्यासाठी तत्पर असतात पण तुमचे कर्म तुमची बुद्धी फिरवतं आणि तुमच्याच कर्माने तुम्ही परमेश्वराच्या म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेपासुन वंचित राहता ( rather स्वतः ला वंचित ठेवता ).

गुरुचरित्राच्या १८ व्या अध्यायांत हेच नरसावधानी गरीब ब्राम्हणाच्या जन्माला येतात.तेव्हा नृसिंह सरस्वती अवतारात ह्याच नरसावधानींवर श्रीपाद श्रीवल्लभ कृपा करुन त्यांस जन्मो जन्मी च्या लक्ष्मी अवकृपेतुन मुक्त करतात. घेवड्याची ती वेल जी पुर्व जन्मात ही त्यांच्या कडे होती तीच अलक्ष्मी स्वरुप होती. नृसिंह सरस्वती  ती घेवड्याची वेल नष्ट करातात , तिला तोडून फेकून देतात . त्या गरीब ब्राम्हणाच्या पत्नी आणि मुलांना वाटते की अरे आमच्या कर्मा ह्या नृसिंह यतींनी तर आमची जीवन वाहिनी घेवड्याची वेल तोडून आमच्यावर तर मोठे संकटच आणले !!

मात्र या जन्मांत नरसावधानी यांची कर्म शुद्धी झालेली असते म्हणूनच ते ती वेल मुळापासून उखडून टाकण्यासाठी जमीन खणतात आणि याच उत्खनातून त्यांना द्रव्याने भरलेला हंडा सापडतो

त्यामुळे असे पहा की नरसावधानी यांना जन्म जन्मांतरीच्या अलक्ष्मी च्या जाचा पासून मुक्त करण्यासाठी श्रीपाद श्रीवल्लभांना जवळ जवळ एकशे अकरा वर्षे मध्ये जाऊ द्यावी लागली आणि त्याकरता त्यांना नृसिंह सरस्वती अवतार ही घ्यावा लागला . श्रीपादांचा जन्म १३२० चा आणि श्रीपाद प्रभू साधारण ते वर्षाचे असतील जेव्हा त्यांनी घेवड्याची भाजी नरसावधानींनी कडे मागितली तेव्हा १३२४ हे साल मानले तर नरसिंह सरस्वती साधारण १४09 साली नरसोबाच्या वाडीला आले. आता विचार करा की श्रीपाद श्रीवल्लभांना ( प्रत्यक्ष परब्रह्म ) नरसावधानींना तेव्हा मुक्त करणे शक्य नव्हतं का ? तर शक्य होतंच, शतवार शक्य होते  , फक्त संकल्प मात्रें श्रीपादप्रभूंनी हे केले असते . पण नरसावधानीचें  कर्मच असे होते की ते आड येत होते आणि परमेश्वर तुमच्या कर्मांत ढवळा ढवळ सहसा करत नाहीत . याचे कारण की Every action will have some reaction somewhere & there will be a cascade effect . आणि म्हणून श्रीपाद श्रीवल्लभांना पंच्याऐशी वर्षे वाट पाहावी लागली. जो पर्यंत नरसावधानींच्या कर्मांची  शुद्धी होत नाही तो पर्यंत श्रीपादांनी काही केले नाही . याचाच अर्थ असाही आहे की नरसावधानी हे पूर्व जन्मांत कधीतरी श्री दत्तप्रभूंचे शिष्यच असावेत (तव पदरी असता तांता आड मार्गी पाऊल पडता , सांभाळून मार्गावरता आणिता दुजा त्राता ). कारण शिष्य जरी गुरूंना विसरला आणि जो तो विसरतोच ! पण सद्गुरू मात्र शिष्याची पाठ सोडत नाहीत , मग कितीही जन्म लागोत .त्यामुळे जे काय घडते ते पुर्व आणि सद्य कर्माधिन आहे. जसे तुमचे कर्म त्या त्या प्रमाणात तुम्हाला परमेश्वराची (श्रीपाद प्रभुंची) प्राप्ती होते किंव्हा होत नाही.

श्रीपाद प्रभुंची विषेश प्राप्ती करुन घ्यायची असेल तर जन्म जन्मांतरी विषेश कर्म करीत रहावे लागते.तेव्हा कुठे एका परिटाला पुढल्या जन्मात बिदर चा राजा होण्यास मीळते. पण कुठेतरी कर्म कमी पडले असेलच म्हणुन तर म्लेंच्छ राजा म्हणून जन्म झाला नाहीतर राजा विक्रमादित्य म्हणून जन्माला आला नसता का?तसे भारताचा पंतप्रधान होणे हेही त्यांच्या कर्मावर अवलंबून आहे.

पण बिदर चा म्लेंच्छ राजा किंवा भारताचा पंतप्रधान होण्यापेक्षा शंकर भट्ट किंवा तिरुमलदास नाहीतर पळणी स्वामी म्हणुन जन्मांस येणं कितीतरी पटीने चांगले आणि लाभदायक आहे पण ते काही इतके सोपे नाही ! तितकेच कठीण ही आहे नाही का?

विचार करा किती जन्मांच्या कर्म शुद्धी नंतर तसे घडेल!!!


अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त

🙏🔥🙏

श्रीपाद राजम शरणं प्रपध्ये

🙏🔥🙏

शनिवार दिनांक २३/१२/२३  , १८:०० hrs .

अजय सरदेसाई (मेघ )

No comments:

Post a Comment